महावितरणचा उपक्रम; यंत्रणा सुधारणार
मुंबई - राज्यातील अडीच कोटींहून अधिक वीजग्राहक असलेली महावितरण ग्राहकांना मराठीतून एसएमएस पाठवणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने ग्राहक असल्याने महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी याबाबतचा आदेश मंगळवारी दिला.
अनेक वर्षांची केवळ मुख्य अभियंत्यांशी संवादाची पद्धत बाजूला सारत यंत्रणेत काम करणारे तंत्रज्ञ आणि लाईनमनसोबत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यातील 16 परिमंडळांतील हे अधिकारी आणि कर्मचारी होते. तंत्रज्ञ, जनमित्र, ऑपरेटर आणि कर्मचाऱ्यांच्या सूचनाही त्यांनी ऐकल्या. त्यानुसार यंत्रणेत सुधारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दर महिन्याला ते अशा प्रकारे संपर्क साधणार आहेत. फोटो मीटर रीडिंग, मीटरचे छायाचित्र, फीडर आणि डीटीसी मीटर रीडिंग, नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणा व इतर दैनंदिन कामे मोबाईल ऍप्सद्वारेच करावीत. याबाबत हलगर्जी केल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नांदेड परिमंडळातील तंत्रज्ञ विशाल वागरे, प्रधान यंत्रचालक रमेश ताडेवाड, अमरावती परिमंडळातील यवतमाळ मंडळ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र विठ्ठलराव धवड यांनी मोबाईल ऍपद्वारे ग्राहक सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संजीव कुमार यांनी त्यांचे कौतुक केले.
|