महाराष्ट्राने नोंदविली 23,609 मेगावॉटची मागणी
मुंबई - देशभरात उष्मा वाढतच असल्यामुळे यंदा विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. बुधवारी (ता. 23) देशभरात 1,70,121 मेगावॉट वीजमागणीची नोंद झाली. गतवर्षी याच काळातील मागणीच्या तुलनेत ती आठ टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातही 23,609 मेगावॉट विजेची मागणी नोंदवली आहे.
यंदा संपूर्ण देशभर उष्णतेची लाट आहे, त्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये विजेची सर्वाधिक मागणी नोंदविण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये 19,029 मेगावॉट, दिल्लीत 6,099 मेगावॉट, राजस्थानमध्ये 10,395 मेगावॉट, गुजरातमध्ये 16,825 मेगावॉट; तर महाराष्ट्रात 23,609 मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली.
विजेला मोठ्या प्रमाणावर मागणी असतानाही जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि उत्तराखंड वगळता इतर कोणत्याही राज्यांत वीजतुटवडा जाणवलेला नाही. दिल्लीतील वीज वितरण कंपनी रिलायन्स इन्फ्राच्या बीएसईएसने हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि भूतानसोबत हायड्रो पॉवर बॅंकिंग दीर्घकालीन करारांमुळे वीजपुरवठा सुरळीत होऊ शकल्याचे म्हटले आहे.
भविष्यात मागणी- पुरवठ्यात तफावत?
विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, सर्वच कंपन्यांनी अल्पकालीन वीज खरेदी करार केले आहेत. दीर्घकालीन करारांअभावी आगामी काळात विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात विषमता असू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
|