मुंबई - 'नाणारवासीयांना फडणवीस सरकार फसवत असून, नाणार रिफायनरीबाबत जे काही चालले आहे ती भाजप-शिवसेनेची मॅच फिक्सिंग आहे. दोन्ही पक्ष जनतेच्या भावनांशी खेळत असून, सरकारचे "आतून कीर्तन बाहेर तमाशा' सुरू आहे,'' अशी टीका प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, की नाणारगावचा औद्योगिक क्षेत्रात समावेश करणारी अधिसूचना रद्द केली, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात; तर मुख्यमंत्री म्हणतात, अधिसूचना रद्द केली नाही. "हायपॉवर कमिटी' ही मंत्र्यापेक्षा मोठी नसते, मात्र मुख्यमंत्र्यांनी "हायपॉवर कमिटी' मोठी आहे, असे म्हणून आपल्या मंत्र्यांची वाईट अवस्था केली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री कवडीचीही किंमत देत नाहीत. जनाची नाही तरी मनाची थोडीशी जरी लाज असेल, तर सुभाष देसाई यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि शिवसेनेने सत्तेबाहेर पडले पाहिजे.''
नाणारवासीयांच्या पाठीशी कॉंग्रेस ठामपणे उभा आहे. नाणारवासीयांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही. नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधून कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज आपला अहवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना सादर केला. 28 एप्रिल रोजी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन शिष्टमंडळ यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळासोबत नाणारवासीयही राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
|