मुंबई - बारावी परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी राज्यभर भरारी पथकाने 97 कॉपीबहाद्दरांना पकडले. मुंबईत मात्र परीक्षेच्या सलग तिसऱ्या दिवशी कॉपीचा एकही प्रकार झाला नाही. गुरुवारी (ता. 2) मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमीळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, उर्दू, फ्रेंच, पाली या विषयांचे पेपर होते. त्यापैकी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमीळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली या विषयांचे पेपर दुपारी 11 ते 2; तर उर्वरित तीन भाषांचे पेपर दुपारी 3 ते 6 या वेळेत झाले. परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी राज्यात कॉपीची अधिक प्रकरणे उघडकीस आली. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, कोकण वगळता अन्य ठिकाणी कॉपीबहाद्दर पकडले गेले. सर्वांत जास्त कॉपी करणारे विद्यार्थी औरंगाबाद येथे सापडले. गुरुवारी औरंगाबादमध्ये तब्बल 55 कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. त्यापाठोपाठ नाशिक व नागपूर येथे 19, अमरावती येथे तीन, तर लातूरमध्ये एक विद्यार्थी कॉपी करताना सापडला. |
|