मुंबई - वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जेवणात भेसळ करणे, अन्नातून विषबाधा होणे असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांवर आणि अशा अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर दलित अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
चेंबूर येथील संत एकनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात 22 फेब्रुवारी 2017 रोजी पाल सापडली होती. जेवणात काचेचे तुकडे, गोगलगाईही आढळून आल्याची तक्रार यापूर्वी विद्यार्थ्यांनी केली होती. मुंबईप्रमाणेच राज्यातील बऱ्याच वसतिगृहांमध्ये कमी-अधिक प्रमाणात जेवणाची अशीच परिस्थिती आहे, असा मुद्दा ऍड. आशीष शेलार यांनी उपस्थित केला. भेसळ केलेल्या अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी आणि हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. त्यावर अशा प्रकारे कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर "ऍट्रॉसिटी' कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली.
|