'इंडिया'तील लोकांनी 'भारता'तील शेतकऱ्यांचा माल घ्यावा - मकरंद अनासपुरे

'इंडिया'तील लोकांनी 'भारता'तील शेतकऱ्यांचा माल घ्यावा - मकरंद अनासपुरे

मुंबई - इंडियातील लोकांनी भारतातील शेतकऱ्यांचा शेतमाल घ्यावा, शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी होईल. पैसे आवश्‍यक आहेत पण ते आपल्याला जगवू शकत नाहीत, असे भावनात्मक उदगार अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ठाणे येथे शुक्रवारी काढले.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालय व माणगंगा ऑर्गेनिक फार्मर्स ग्रुप तसेच चार गाव जलयुक्त शिवार अभियान यांनी "शेतकऱ्यांचा शेतमाल पोलिसांच्या दारात' हा संयुक्त उपक्रम ठाण्यातील पोलिस वसाहत येथे राबवला. त्या वेळी अनासपुरे बोलत होते. या वेळी शेतमालाच्या विक्रीचे उद्‌घाटन ठाण्यांचे पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग व अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले.

साताऱ्याच्या दुष्काळी माण तालुक्‍यातील पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी या चार गावांतील शेतकऱ्यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या सहकार्याने हा उपक्रम ठाण्यांच्या पोलिस वसाहतीत आजपासून सुरू केला. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांबरोबर इतर सरकारी कर्मचारी व सामान्य नागरिकांनाही या ठिकाणी शेतमाल खरेदी करता येणार आहे. व्यापारी, दलाल व मध्यस्थ यांना वगळून शेतकऱ्यांचा हा माल स्वस्त दरात थेट विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध होणार असून, सुरवातीला आठवड्यातील दोन दिवस व कालांतराने दररोज हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पोलिसांचा आदर करा!
आपण नेहमीच पोलिसांना दूषणे देतो, त्यांच्याकडून अपेक्षा करतो; पण आपण त्यांच्यासाठी काय करतो याचा विचार सामान्यांनी करावा. सर्वांनी पोलिसांचा आदर करावा, आपले रक्षण करणाऱ्या या रक्षकांचे मन समजून घ्यावे, असे भावनिक आवाहन मकरंद अनासपुरे यांनी केले. तसेच हा उपक्रम सुरू करण्यात शेतकऱ्यांना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांचे आभारही मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com