कोपरखैरणे (नवी मुंबई) - राज्यात सुरू झालेल्या भारनियमनाच्या पहिल्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा बंद पडल्यामुळे बोनकोडे गावातील एका वृद्धेचा मृत्यू झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत कालपासून अचानक भारनियमन सुरू करण्यात आले. मात्र, त्याच्या वेळा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्याचा फटका बोनकोडे येथील पाटील कुटुंबीयांना बसला. विमल नारायण पाटील (वय 73) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना घरीच कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी अचानक भारनियमन सुरू झाल्याने ही यंत्रणा बंद पडली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
|