माध्यान्ह भोजनासाठी लागणाऱ्या धान्यात अळ्या आणि किडे

mokhada
mokhada

मोखाडा : जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षाण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली तीन महिन्यांपासुन दिला जाणाऱ्या माध्यान्ह भोजनासाठी अळ्या आणि किडलेला धान्य पुरवठा केला जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव अळ्या पडलेल्या आणि सडक्या धान्याचे मध्यान्यभोजन खाण्याची वेळ आली आहे. या बाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नसल्याने, पालक संतप्त झाले आहेत. प्रशासनानेही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. 

जव्हार  तालुक्यात २५५ जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता- १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वी पर्यंत  एकूण- १६ हजार ३४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दिले जाणारे मध्यान्यभोजन हे कुजका आणि अळ्या पडलेल्या धान्याचे दिले जात आहे.  मागील नोव्हेंबर- डिसेंबर  2027 मध्ये पंचायत समिती सदस्य सुधाकर वळे आणि मनू गावंढा यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दिला जाणारा मध्यान्ह आहाराचा प्रश्न पंचायत समितीच्या आढावा बैठकीच्यावेळी शिक्षण विभागासमोर उपस्थित केला होता. तसेच पालकांनी ही तक्रारी केलेल्या असतांनाही प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या मध्यान्य भोजनासाठी तांदूळ, मूगडाळ, वाटाणा, डाळ, तूरडाळ, मोहरी, हळद, तेल, असा धान्याचा पुरवठा करण्याचा ठेका महाराष्ट्र राज्य कॉ. मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांना देण्यात आला आहे. मात्र  ठेकेदाराकडून कुजक्या आणि सडक्या तसेच अर्धवट धान्याचा पुरवठा सर्रास केला जात असून तसेच अपुऱ्या डाळी पुरवठ्यामुळे शाळेतील मुलांना कोरडा भात देखील खावा लागत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. 

प्रत्येक महिन्याला महाराष्ट्र राज्य कॉ. मार्केटिंग फेड्रेशन मुंबई यांच्याकडून पुरवठा केला  जाणारा धान्य पुरवठा हा काही पोते सोडले तर बऱ्याच पोत्यांत अळ्या पडलेल्या सडका आणि कुजका असतो. मात्र काही अडचणींमुळे आम्ही या गोष्ठी सांगू शकत नाही. आम्हला नाईलाजास्तव खराब धान्यही उतारुन घ्यावे लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळेत खिचडी, डाळ, भात शिजवून देत असलेल्या महिला बचत गटांतील महिलांही सांगतात, अळ्या पडलेले धान्यही आम्हला निवडून खिचडी डाळ, भात करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा आम्ही त्या शाळेतील शिक्षकांच्या लक्षात देखील आणून देत आहोत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. 

ज्या जिल्हा परिषद शाळांना सडका आणि कुजका अळ्या पडलेला जुना तांदूळ, डाळ असेल तर त्या शिक्षकांनी तो धान्य उतारून घेवू नये, अशा सूचना शिक्षकांना केल्या आहेत. परंतु तरीही ज्या शाळांना अळ्या पडलेल्या आणि खराब धान्य येत असेल तर आमच्या निदर्शनात आणून द्यावे, असे गट शिक्षण अधिकारी भरत कासले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com