मुंबई - चार वर्षांपूर्वी झालेल्या एआयबी नॉकआउट या शोमध्ये अश्लील आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप असलेले अभिनेता रणबीर सिंग आणि अर्जुन कपूर यांना फौजदारी फिर्याद रद्द करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून मंगळवारी कोणताही दिलासा मिळाला नाही.
सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी रणबीर आणि अर्जुन कपूरविरोधात गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद केली आहे. पुण्यातही या दोघांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी रणबीर आणि अर्जुनने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या समन्सला स्थगिती देण्याची तसेच कोणतीही कारवाई न करण्याची मागणी दोघांच्या वतीने करण्यात आली होती; मात्र न्या. आर. एम. सावंत आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य करण्यास तूर्तास नकार दिला. याचिकेबाबत तक्रारदाराने बाजू मांडल्यानंतर निर्णय घेऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेवर पुढील सुनावणी 3 एप्रिलला होणार आहे.
एआयबी नॉकआउट या शोचा एक कार्यक्रम 2014मध्ये वरळीत झाला होता. त्यात रणबीर, अर्जुनसह करण जोहर, दीपिका पदुकोन, आलिया भट आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ एक वर्षानंतर यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला. त्याआधारे सर्व कलाकारांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने गेल्या वर्षी झालेल्या अन्य एका सुनावणीत दीपिका, करणविरोधात कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
|