वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त

वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त

ठाणे  - वृक्ष प्राधिकरण आणि त्यावरील सदस्यांची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झाली असल्याची अप्रत्यक्ष कबुली ठाणे महापालिका प्रशासनातर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. त्या आशयाचे पत्रच महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सादर केले. या पत्रात हे वृक्ष प्राधिकरण बरखास्त करण्यात येईल. त्याबरोबरच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्तीदेखील रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गेले काही दिवस या वृक्ष प्राधिकरणाबद्दल सुरू असलेली चर्चा थांबल्याचे मानले जात असून ही समिती बरखास्त झाली आहे.

महापालिकेच्या पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जोपर्यंत वृक्ष प्राधिकरण समिती नव्याने गठित होत नाही, तोपर्यंत यापूर्वी न्यायालयाने दिलेला वृक्ष प्राधिकरण स्थगितीचा अंतरिम आदेश मागे घेण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने ही स्थगिती कायम ठेऊन पालिकेला नवीन समिती पुनर्गठित करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे; मात्र त्याचवेळी महापालिकेने अशाप्रकारचे पत्र न्यायालयात सादर होणार असल्याची माहिती वृक्षप्राधिकरणातील अनेक सदस्यांना नसल्याने त्यांना त्याचा धक्का बसल्याचे दिसले. 

ही याचिका दाखल झाल्यानंतर वृक्ष तोडण्यावर बंदी असतानाही पालिकेने वाघबीळ येथे काही वृक्ष जमीनदोस्त केले असून त्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यावर आता ७ मार्चला सुनावणी होईल. आयुक्तांना २५ वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याची सोय आहे. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेत आयुक्त कोणतीही प्रक्रिया न पाळता अशा प्रकारे २५ वृक्ष तोडण्याची परवानगी कशी देऊ शकतात, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी जानेवारीचा अंतरिम आदेश कायम ठेवत आयुक्तांना अशा परवानग्या आता देता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने सांगितले. मात्र त्याचवेळी आणिबाणीच्या परिस्थितीत धोकादायक वृक्ष तोडण्यास आयुक्त स्वत-च्या अधिकारात; पण प्रक्रिया करूनच परवानगी देऊ शकतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पाच हजार वृक्ष वाचणार
ठाणे पालिकेतील नव्याने गठित वृक्ष प्राधिकरण समितीतील सदस्यांना वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेसं ज्ञान नाही आणि निवडीच्या वेळी नियम आणि कायद्यातील तरतुदी न पाळल्याने ही समिती बेकायदेशीर आहे. यासाठी ठाण्यातील ठाणे मतदार जागरण अभियानाचे कार्यकर्ते रोहित जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे ठाण्यातील सध्या तोडण्याच्या परवानगी मागण्यात आलेले किमान पाच हजार वृक्ष वाचल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com