मुंबई - नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीबाबत शिवसेनेने "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. मुंबईहून "मातोश्री'चे खास दूत त्यासाठी पनवेलला जाणार आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन युतीबाबत ते निर्णय घेतील. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा आग्रह कायम आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेची पहिली निवडणूक 24 मे रोजी होणार आहे. कोकणात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी "मातोश्री'वर स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढण्याची मागणी करण्यात आली.
यापूर्वी शिवसेनेने रायगड जिल्ह्यात अनेकदा "शेकाप'बरोबर युती केली आहे. या वेळी भाजपला बाजूला ठेवण्यासाठी "शेकाप'शी युती करावी का, याची चाचपणी करून पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
|