दादर - यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सोमवारी (ता. 20) "कृष्णकुंज' येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले. यामागे महापालिका निवडणुकीत मनसेचा झालेला पराभव हे कारण आहे की ठाकरे यांचे वैयक्तिक कौटुंबिक कारण आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. आता सात दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोमवारी "कृष्णकुंज' या त्यांच्या निवासस्थानी मनसेचे सर्व विभागप्रमुख व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी यंदा गुढीपाडवा मेळावा होणार नसल्याचे जाहीर केले. वैद्यकीय कारणास्तव आपण कुटुंबीयांसह परदेशात जाणार असल्याने पाडवा मेळावा होणार नाही, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे कुटुंबातील वाद, राजकारणात आलेले अपयश, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. गतवेळच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी मनसेला अवमान नोटीसही बजावण्यात आली होती. मनसेने जाणीवपूर्वक आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. यंदा अजूनही मेळाव्यासाठी परवानगी किंवा कोणतीही हालचाल नसल्यामुळे मेळावा होणार का, हा संभ्रम होता. सोमवारी मेळावा होणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. गुढीपाडवा मेळावा यंदा होत नसला तरीही प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या विभागात स्थानिक पातळीवर कार्यक्रम करावेत, असे आदेशही ठाकरे यांनी विभागप्रमुख व कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मनसेच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा मनसे मेळावा यंदा होणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांनी सोमवारी "कृष्णकुंज' येथे झालेल्या बैठकीत केली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आणि सर्व विभागप्रमुखांना बोलावण्यात आले होते.
|