मुंबई - मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकाच्या कानफटात मारू. मुंबईत त्यांची एकही इमारत उभी राहू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी दिला.
मांसाहारी कुटुंबांना घरे नाकारणाऱ्या विकसकांचे पाणी बंद करावे, अशी ठरावाची सूचना मनसेचे महापालिकेतील तत्कालीन गटनेते संदीप देशपांडे यांनी 2014 मध्ये महासभेत मांडली होती. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला होता. पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत तशी तरतूद करण्यासाठी हा ठराव प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र ही बाब पालिकेच्या अखत्यारीत येत नाही. असा प्रकार घडल्यास पोलिसांत तक्रार करावी, असा सल्ला प्रशासनाने दिला. त्यावरून आज देशपांडे यांनी हा इशारा दिला आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा विकसकाने घर नाकारल्यास मनसेच्या कार्यालयात तक्रार करा. आम्ही त्या विकसकाच्या कानफटीत मारू, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसेला उभारी मिळणार?
लोकसभा, विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकांमध्ये दणकून आपटलेल्या मनसेला मुंबईतील मांसाहारी विरुद्ध शाकाहारी वादामुळे उभारी मिळण्याची शक्यता आहे. राज्यभर मनसेच्या पदरी अपयश आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे. काही पदाधिकारी नाराजही आहेत; मात्र शाकाहारी-मांसाहारी वादाच्या निमित्ताने मनसे रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.
|