मुंबई - 'एखाद्या साहित्य संस्थेने कोणा मोठा उद्योजक किंवा राजकीय नेता पाठीशी नसताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य पेलणे कठीणच असते, खर्च आवाक्याबाहेर जातो. यावर उपाय म्हणून पहिल्यांदाच साहित्याचे भोई होताना मान्यवरांनी प्रवास खर्च किंवा मानधनाची अपेक्षा करू नये,'' असे आवाहन आयोजक संस्था असलेल्या बडोदा साहित्य परिषदेने केले आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागतही केले असले, तरीही प्रत्यक्षात काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या आवाहनाला यश मिळाल्यास यापुढील संमेलनांसाठी हा पायंडा पडेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
बडोदा येथे 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. बडोदा साहित्य परिषद या संमेलनाचे आयोजक आहे. महाराष्ट्रातील साहित्यासाठी वर्षानुवर्षे अनेक संस्था काम करीत असतात. मात्र, साहित्य संमेलनासाठी आमंत्रण देताना मात्र खर्चाचा आकडा पाहून अनेकदा संस्था काढता पाय घेतात. यावर्षी कमीत कमी खर्च करावा, खर्चासाठी मान्यवरांनीही हातभार लावावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. साहित्य संमेलनासाठी चर्चासत्र, कविसंमेलन, उद्घाटन अशा अनेक कार्यक्रमांसाठी सुमारे 200 मान्यवरांना निमंत्रित केले जाते. त्यांच्या निवास, भोजन, मानधन व प्रवास खर्चाची तरतूद आयोजक संस्थेलाच करावी लागते. त्यामुळे संमेलनातील खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संमेलनाला येणाऱ्या मान्यवरांनी स्वतः प्रवास खर्च करावा. मानधनाची अपेक्षा करू नये, असे आवाहन साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आले आहे. अनेकांनी याचे स्वागतही केले. कोणी यास सहमत नसेल तर आम्ही खर्च देऊ. मात्र, खर्च कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. सध्या गुजरातमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणूक झाल्यानंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडून संमेलनाला मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील.
- दिलीप खोपकर, अध्यक्ष, बडोदा साहित्य परिषद
|