मुंबई : मागील तीन महिन्यांपासून चाललेले मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचे गुऱ्हाळ अखेर सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संपले आहे. जवळपास सव्वा महिन्यापासून अहोरात्र काम करणाऱ्या नव्या टीमने बुधवारी उर्वरित दोन विषयांचे निकाल लावले आहेत. मात्र, अद्यापही 9 हजार 700 विद्यार्थ्यांचे निकाल बाकी असल्याने आता गहाळ झालेल्या उत्तरपत्रिका शोधण्याचे आव्हान मात्र मुंबई विद्यापीठासमोर कायम आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल कधीपर्यंत लागेल, याबाबत कोणतेच ठाम आश्वासन मुंबई विद्यापीठाकडे नाही.
आठवडाभरापूर्वी विद्यापीठाच्या नव्या टीमने पत्रकार परिषदेत उत्तरपत्रिका तपासणीतील सत्य स्थिती सांगितली होती. त्या वेळी 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली होती. त्यापैकी नऊ हजार 700 विद्यार्थ्यांचे निकाल मंगळवारी सायंकाळपर्यंत राखीव होते. हे निकाल कधी लागतील, याबाबत मात्र काहीच स्पष्टता नसल्याची कबुली परीक्षा भवना'चे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी चार हजार 200 उत्तरपत्रिका तपासण्याचे काम बाकी होते. केवळ 75 प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत होते. आठवडाभरापूर्वी आठ निकाल प्रलंबित होते; मात्र सात दिवसांत एम.कॉम. रेग्युलरचे व एम. कॉम. आयडॉलचे मिळून सहा विषयांच्या परीक्षांचे निकाल लावण्यात आले.
शिंदे यांचा कार्यकाळ वाढणार?
मुंबई विद्यापीठाचा निकाली गोंधळ वाढल्यानंतर कुलगुरू डॉ. संजय देशमुख रजेवर गेले. त्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रभारी कुलगुरुपदी राज्यपालांनी नियुक्त केले. निकालाचा गोंधळ सावरण्यासाठी त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. महिनाभरात निकालांचा वेग, प्रशासनातील कामाची पद्धत पाहता, अजून दोन महिन्यांसाठी शिंदे यांचा कार्यकाळ वाढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
|