मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या घरांच्या सोडतीसाठी सुमारे 20 हजार जणांनी अर्जांची नोंदणी केली आहे. यंदा पहिल्यांदाच म्हाडाने अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी आरटीजीएस/एनईएफटी प्रणाली सुरू केली; मात्र त्याला अर्जदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (ता. 24) सायंकाळपर्यंत 3389 जणांनी अर्ज केले.
मुंबई मंडळाने विविध ठिकाणच्या 819 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 10 नोव्हेंबरला ही सोडत काढण्यात येणार आहे. शनिवार (ता. 16)पासून अर्जदारांची नोंदणी सुरू झाली. यंदा म्हाडाने प्रथमच अनामत रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाईन आणि एनईएफटी/आरटीजीएस प्रणालीचा पर्याय दिला आहे; मात्र या प्रणालीचा वापर खूपच कमी अर्जदारांनी केला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत 78 जणांनी या प्रणालीद्वारे अनामत रक्कम भरली; तर 139 जणांनी डीडीद्वारे अनामत रक्कम जमा केली. याउलट ऑनलाईन पेमेंटला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 3172 जणांनी अनामत रक्कम ऑनलाईन भरली.
सोडतीत नोंदणी करण्यासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत 19,430 जणांनी नोंदणी केली. यापैकी 12,166 जणांचे अर्ज अपूर्ण आहेत. 8,634 जणांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. 143 जणांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
|