नारायण राणेंचीही प्रचारातून माघार
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. शिवसेनेवर प्रहार करणारे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही पालिका निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम एकाकी पडल्याचे चित्र आहे.
पक्षातील गटबाजीचा फटकाही निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर आंदोलने करून कॉंग्रेसने जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणुकीपूर्वीच पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी मुंबई कॉंग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याने त्यांचे समर्थक प्रचारातून अंग काढून घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही मुंबईत निवडणूक प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी आग्रही होतो. मात्र, संजय निरुपम यांना आघाडीची गरज वाटत नाही. मुंबईत प्रचार करण्यासाठी ते सक्षम आहेत. मला राज्यातील 25 जिल्ह्यांत जायचे आहे, असे राणे यांनी पत्रकारांना सांगितले.
राणे यांनीही प्रचारातून माघार घेतल्याने कॉंग्रेसला नेत्यांची कमतरता भासणार आहे. सर्वच प्रमुख नेते निरुपम यांच्या कारभारावर नाराज असल्याने ते एकाकी पडले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेस यापूर्वीच्या निवडणुकांएवढ्या जागा तरी राखणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
|