मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी अर्थात उपनगरी रेल्वे धोकादायक ठरू लागली आहे. दहा महिन्यांत रेल्वे प्रवासादरम्यान दोन हजार 472 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक 305 प्रवाशांचे मृत्यू कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाले आहेत. त्यापाठोपाठ कुर्ल्याची हद्द प्रवाशांसाठी धोकादायक ठरली आहे.
लोहमार्ग ओलांडताना आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2017 या दहा महिन्यांत रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या विविध अपघातांमध्ये दोन हजार 472 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात पुरुषांची संख्या दोन हजार 845, तर महिलांची संख्या 361 आहे. अन्य दोन प्रवाशांनीही अपघातात जीव गमावला. मृत्यू झालेल्या 803 प्रवाशांची ओळख पटू शकली नाही. रेल्वे अपघातात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान दोन हजार 834 प्रवासी जखमी झाले. सर्वाधिक अपघातांचे प्रमाण डोंबिवली ते कल्याणदरम्यान आहे. दहा महिन्यांत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 447 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अंधेरी आणि बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 358 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 305 प्रवाशांचा मृत्यू झाला. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 274 प्रवाशांचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 142, अंधेरी 104, बोरिवली 254, वसई 179 आणि वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 140 प्रवाशांचा मृत्यू झाला.
|