मुंबई - ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत आतापर्यंत 175 हून अधिक गोविंदा पथकांनी आणि साडेआठ हजार गोविंदांनी अपघाती विमा उतरवला आहे. प्रत्येक गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
गोविंदांनी आपला अपघाती विमा उतरवावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक गोविंदा पथकांनी गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले आहे. दहीहंडी फोडताना मृत्यू झाल्यास दहा लाख, दोन अवयव वा दोन डोळे गमावल्यास दहा लाख, एक हात, पाय किंवा डोळा गमावल्यास पाच लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये, अपघाती व्यक्तीस रुग्णालयात राहावे लागल्यास 50 हजारांचे विमा कवच केवळ 100 रुपयांत देण्यात येणार आहे.
आतापर्यंत 103 गोविंदा पथकांनी तर 3,720 गोविंदांनी वैयक्तिक विमा संरक्षण घेतले आहे, तर लोढा चॅरिटेबल ट्रस्टने 42 मंडळांचा आणि 2,100 गोविंदांचा विमा उतरवला आहे. पांडुरंग सकपाळ यांनी 20 मंडळांचा आणि 2,250 गोविंदांचा विमा उतरवला आहे.
|