मुंबई - गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील अडचणींवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करून संबंधितांची आठवडाभरात बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज दिली.
शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे आश्वासन दिले. मुंबईत गणेश मंडळांचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन शेलार यांनी सत्तेचा लाभ उठवत या मंडळांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवल्याचे सांगितले जाते.
मुंबई महापालिका निवडणुकीत या गणेश मंडळांचा किती लाभ होतो, हे शेलार यांना माहीत आहे. त्या दृष्टिकोनातून शेलार यांनी ताबडतोब गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबईतील "शांतता क्षेत्रा'मुळे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संदर्भात दोन्ही उत्सव मंडळांच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची शेलार यांनी भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची "वर्षा'वर जाऊन भेट घेतली; तर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत तातडीने बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार याच आठवडाभरात ही बैठक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
|