मुंबई - विक्रोळी पार्कसाइट येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेतील गैरव्यवहार उघड करू नये, यासाठी आपणास तीन विकसकांनी 40 लाखांची लाच दिली, असा आरोप महाराष्ट्र मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते संदीप येवले यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
पार्कसाइट येथील हनुमान नगरात 22 वर्षांपासून एसआरए प्रकल्प बंद आहे. त्याचा फायदा स्थानिकांना; तसेच सरकारलाही होत नाही. या योजनेबाबत माहिती अधिकाराखाली मी माहिती मिळवली आहे. या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे मला समजले होते. हा गैरव्यवहार उघड करू नये यासाठी मला तीन विकसकांनी 11 कोटींची ऑफर दिली, अशी माहिती येवले यांनी दिली. त्यापैकी 40 लाखांची लाच रोख रकमेच्या स्वरूपात तीन विकसकांनी मला दिली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवणार असल्याचेही येवले यांनी सांगितले. लाचेच्या स्वरूपात मला दिलेले पैसे मी मुख्यमंत्री निधीसाठी देणार आहे, असेही ते म्हणाले.
|