मुंबई - बैलगाड्यांची शर्यत हा क्रूर खेळ आहे. या खेळासाठी बैलांचा छळ केला जातो, अशी तक्रार करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
बैलगाड्यांच्या शर्यतीवर घातलेली बंदी सरकारने उठवली आहे. याबाबतच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी नुकतीच स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार बैलगाडींच्या शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असून, बैलांचा छळ करण्याला मनाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या शर्यतींमध्ये बैलांचा छळ होतो. त्यात त्यांना गंभीर दुखापत होते, असे याचिकाकर्ते अजित मराठे यांनी नमूद केले आहे. बैलांचा वापर शेतीच्या कामासाठी होतो. त्यांना शर्यतीमध्ये पळवणे चुकीचे आहे, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. राज्य सरकारने राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे सरकारतर्फे एकप्रकारे बैलगाडी शर्यतींचे समर्थन केले आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
|