मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करू, असे आश्वासन दिले होते; परंतु अनेक परीक्षांचे निकाल रखडले आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे बुधवारी (ता.2) दुपारी कालिना येथील मुंबई विद्यापीठाला घेराव घालण्यात येईल, अशी माहिती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
निरुपम म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कुलगुरू संजय देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
याविषयी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माजी न्यायाधीशांची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे.
मुंबई विद्यापीठाच्या 160 वर्षांच्या काळात प्रथमच निकाल रखडले आहेत. अनेक महिन्यांनंतरही निकाल लागलेले नाहीत. सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. या सर्व निकालांची जबाबदारी "मेरिट ट्रॅक' कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीत भाजपचे काही मोठे नेते गुंतलेले आहेत. या नेत्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच या कंपनीला काम देण्यात आले होते, असा आरोप निरुपम यांनी केला.
|