मुंबई - मुंबई कॉंग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा अशी ओळख असलेले मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार राजहंस सिंह यांनी सोमवारी (ता.4) अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यानंतर राजहंस सिंह हे कॉंग्रेसचे मुंबईतील उत्तर भारतीय नेतृत्व मानले जात होते.
महापालिका निवडणुकीच्या आधीपासून त्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, सिंह यांनी त्यांना दाद दिली नव्हती. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलारही होते. कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातून सिंह भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत सिंह यांनी त्यांचा मुलगा नितेश सिंह याला उमेदवारी मिळवून दिली होती; मात्र त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते कॉंग्रेसपासून काहीसे लांब गेले होते.
गुरुदास कामतांची खेळी?
राजहंस सिंह हे गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक मानले जातात; मात्र, काही वर्षांपासून निरुपम यांच्या कथित मनमानीला कंटाळून कामतही पक्षापासून दूर गेले. यापूर्वी त्यांचा भाचा माजी नगरसेवक समीर देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी राजूल देसाई या भाजपच्या नगरसेविकाही आहेत. त्यामुळे सिंह यांचा भाजपप्रवेश ही कामत यांची खेळी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
|