मुंबई - विमानतळ परिसरातील बेकायदा उंच इमारतींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले.
विमानतळ परिसरात उंच इमारती उभारण्यावर सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आलेले आहेत. या नियमांचा भंग करत अनेक विकसकांनी उंच इमारती बांधल्या आहेत किंवा त्यांचे काम सुरू केले आहे. याबाबत चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेणॉय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
नागरी उड्डाण मंत्रालयाने या बेकायदा इमारतींची दखल घेऊन त्यांवर कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने या वेळी दिले. दरम्यान, विभागाने केलेल्या पाहणीनंतर एकूण 137 बांधकामांपैकी सुमारे 35 बांधकामांवर कारवाईची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. या याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 15) होणार आहे.
|