मुंबई - खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल 16 वर्षांनंतर अटक करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले. शिरीष भुवतलाल शहा असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणातील तक्रारदार कांदिवली येथे एका खासगी कंपनीत कामाला होते. 2 ऑक्टोबर 1997 मध्ये त्यांना खंडणीसाठी धमकीचा दूरध्वनी आला. अरुण गवळी टोळीचा सूत्रधार डी. के. याने तक्रारदाराला "दगडी चाळीत फोन कर, असे सांगून चार कोटींची खंडणी दे; अन्यथा कुटुंबीयांसह ठार मारू,' अशी धमकी दिली होती. त्याकडे तक्रारदारांनी दुर्लक्ष केले. त्यानंतरही डी. के. याचे तक्रारदाराला दूरध्वनी सुरूच होते. काही दिवसांनी डी. के. तक्रारदाराच्या कार्यालयात पोचला. तेथे त्याने त्याच्या सचिवाला बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली. चर्चेवेळी आठ लाख रुपये देण्याचे ठरले. रक्कम मोठी असल्याने तक्रारदाराने कांदिवली येथील सदनिका आणि मोटार विकली. विक्रीतून जमा झालेले पैसे डी. के.ला दिले.
2001 मध्ये त्यांना पुन्हा धमकीचे दूरध्वनी येऊ लागले. अखेर त्यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत दोन फरारी आरोपींची नावे पुढे आली. त्यात शिरीष भुवतलाल शहा याचेही नाव होते. पोलिस त्याच्या शोधात होते. तो अंधेरी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
|