तुर्भेत बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

तुर्भेत बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

तुर्भे - वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आणि रस्त्यांची सुरू असलेली कामे यामुळे तुर्भेतील वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली आहे. ती सोडवायची असेल तर येथे उड्डाणपूल आणि वाहनतळ बांधण्याची गरज आहे. तुर्भे हे जंक्‍शन असल्याने एमआयडीसी, मुंबई, ठाणे आणि शिळफाटा येथे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. चिंचोळे रस्ते आणि निवासी संकुलांचे जाळे यामुळे येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यात बेकायदा पार्किंगचीही भर पडत आहे.

तुर्भे पूर्व भागात कारखान्यांचे जाळे आहे. या कारखान्यांसाठी व बांधकामासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार वस्तूंची ने-आण करण्यासाठी अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. अनेकदा ही वाहने मालाची चढ-उतार करण्यासाठी मुख्य रस्त्यांवरच उभी असतात. यामुळे जनता मार्केट परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. या ठिकाणी कपडा बाजार, लादी, लोखंड, स्टील अशा वस्तूंचा बाजार आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंचे हे एकमेव मार्केट आहे; मात्र या ठिकाणच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तुर्भे रेल्वेस्थानकाकडून जनता मार्केटकडे जाताना उड्डाणपुलाजवळ वाहनाची रांग लागलेली असते. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. जनता मार्केटपासून सरळ बॅंक ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी आणि पालिकेची दोन बंद फिरती शौचालये यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. या मार्गावर नो पार्किंग असूनही तेथे वाहने उभी असतात.

पंचतारांकित हॉटेल, बॅंका, वाहनांचे शोरूम यामुळे येथे उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. तुर्भे गावाच्या मागच्या बाजूचे रस्ते अतिशय अरुंद आहेत. तेथे रिक्षा, शाळांच्या बस, प्रवासी व खासगी वाहने यांची गर्दी असल्याने या भागात कायम वाहतूक कोंडी असते. तुर्भे स्मशानभूमीपासून सिटी मॉलच्या पुढे वाहने उभी असतात. त्यामुळे रोज सकाळ-सायंकाळी येथे वाहनांची रांग लागलेली असते. तुर्भे गावातील ग्रामस्थांना वाहन पार्किंगसाठी जागाच नाही. त्यामुळे ते जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. पूर्वेकडील तुर्भे झोपडपट्टीमध्येही बेकायदा पार्किंग होते. येथील फायझर रोडवरील परिस्थिती तर अतिशय गंभीर बनली आहे. याच मार्गातून कल्याण व डोंबिवलीसाठी बस धावतात. येथे एकीकडे फेरीवाले; तर दुसरीकडे दुकानदारांची वाहने असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. या सर्व प्रकाराकडे वाहतूक पोलिसही लक्ष देत नसल्याने त्यांचे फावते.

आमची कारवाई सातत्याने सुरू आहे. कारवाईसोबत प्रबोधन करावे लागते. त्यामुळे १५ दिवसांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. तुर्भे गावठाण असल्याने त्यांना पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे सम-विषम पार्किंग सुरू केले आहे. यामुळे काही दिवसांत बेशिस्त पार्किंगला लगाम बसेल.
- मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक (वाहतूक)

पालिका व वाहतूक विभागाची संयुक्त कारवाई तुर्भे परिसरात सुरू आहे. कोंडीबाबत तसे वाहतूक विभागाला पत्र दिले आहे. जनता मार्केट हे वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. ती सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- अनंत जाधव, तुर्भे विभाग अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com