मुंबई - अकरावी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी स्वयंअर्थसाह्य तत्त्वावर महाविद्यालयांना वाढीव तुकड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडेही जवळपास एक लाख जागा आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशांत तब्बल तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल.
दहावीत मुंबईतून तीन लाख आठ हजार 996 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला, वाणिज्य, विज्ञान, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम मिळून दोन लाख 92 हजार 890 जागा आहेत. त्यामुळे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने म्हटले आहे. तंत्र व शिक्षण संचालनालयाकडेही एक लाख जागा आहेत. अकरावीनंतर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन तंत्रज्ञान, संगणक आदी मिळून विविध अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे मुख्य विद्या शाखांव्यतिरिक्तही उर्वरित जागा याद्वारे सामावल्या जातील, असे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले. वाढीव तुकड्यांच्या मान्यतेसह मुंबई विभागात साडेतीन हजार अतिरिक्त जागांची मंजुरी शिक्षण विभागाने दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
|