2008, 2009 मध्येही दिली होती माफी
मुंबई - मुंबईतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शिरस्ता जुनाच असून आघाडी सरकारच्या कार्यकाळातही या महानगरीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याचे समोर आले आहे. सहकार विभागातील सूत्रांनी मुंबईत कर्जमाफी कशी काय दिली गेली, याचा शोध सुरू करताच पूर्वीच्या दोन्ही कर्जमाफीतही मेट्रो मुंबईत माफी दिली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अधिकाऱ्यांनी जुन्या कागदपत्रांच्या फाईली तपासल्या असता, 2008 मध्ये केंद्र शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीत मुंबई शहरातील 269 तर उपनगरातील एक असे 270 शेतकरी मदतीस पात्र ठरला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर 2009 मध्ये मुंबई जिल्ह्यात तब्बल 287 कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारने माफ केली असल्याचेही समोर आले आहे. हे लाभार्थी नेमके कोण होते, ते यादीत कसे आले याचा शोध घेणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घडण्यामागची कारणे काय याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, आज प्राथमिक पाहणीत व्यावसायिक बॅंकांनी दिलेल्या कर्जात मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था तसेच काही फलोत्पादन संस्थांनी मुंबईत असतानाही कर्ज घेतले होते हे स्पष्ट झाले आहे.
|