मुंबई - अवयवदानाबाबतच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारने कशा प्रकारे यंत्रणा तैनात केली आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासंबंधित दाखल झालेल्या एका याचिकेवर न्यायाधीश अनुप मोहत्ता यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. "ब्रेन डेड' रुग्णाचे मूत्रपिंड वापरण्याबाबत परवानगी मागण्यासाठी ऍड. आशिष मेहता यांच्यामार्फत याचिका करण्यात आली आहे. संबंधित दात्याचा बुधवारी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अवयवदानाबाबतच्या कार्यवाहीसाठी कशा प्रकारे यंत्रणा उभारली आहे, याचा तपशील देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. अशी यंत्रणा नसेल, तर कशा प्रकारे योजना आखणार, याची माहिती देण्याचे आदेश देतानाच याबाबत एक समिती नेमणे गरजेचे आहे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.
|