मुंबई - दक्षिण मुंबईतल्या कुपरेज परिसरात 17 दिवसांपूर्वी घोड्यावरून पडून जान्हवी शर्मा या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली. आयोगाने आता याप्रकरणी मुलांच्या सुरक्षेकरिता कोणत्या उपाय योजना केल्या, त्याचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गिरगावमध्ये राहणारी जान्हवी ही कुपरेज मैदानात घोड्यावरून पडली होती. घोड्याचा पाय खड्ड्यात गेल्याने हा अपघात झाला होता. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी घोड्याचा हॅंडलर सोहम जैस्वालला अटक केली होती. त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जान्हवीच्या मृत्यूची दखल राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. आयोगाने नुकतीच पालिकेला नोटीस बजावली असून बाजू मांडण्यास सांगितले आहे.
आयोगाने चौकशी दरम्यान पालिका अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली आहे. घोडागाडी मालकांना पालिकेने शुल्क आकारून परवानगी दिली होती, असे आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. घोड्यांच्या मालकांना अटी घातल्या होत्या काय, याबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावर पालिकेने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे समजते.
लहान मुलांच्या सुरक्षेबाबत कोणत्या उपाय योजना केल्या, भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली, त्याबाबतचा अहवाल पालिका आणि पोलिसांकडून मागवला आहे.
|