जवान आणि शेतकरी मरतोय; सरकार खुशाल! : राज ठाकरे

Raj Thackray
Raj Thackray

मुंबई : 'सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भाजपचे हे सरकार खुशाल आहे. फक्त थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काहीही कामाचे नाही', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) केली. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला मनसेने पाठिंबा दिला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, 'या संपाला माझा पाठिंबा आहे. पण गिरणी कामगारांचे जे झाले, ते या शेतकऱ्यांचे होऊ नये. हे सरकार थापा मारून सत्तेवर आले आहे. 'कर्जमाफी देता येणार नाही' हे विरोधी पक्षात असताना यांना माहीत नव्हते का? कॉंग्रेस आघाडीचे सरकार घालविण्यासाठी भाजपने जनता, शेतकऱ्यांची फसवणूक केली. 'खोटे बोललो' म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मुख्यमंत्री कर्जमाफी जाहीर करू शकतात; पण ते मनावर घेत नाहीत.'' 

'सध्याचे सत्ताधारी सतत खोटे बोलत असतात' असा आरोपही राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला. 'तीस हजार विहिरी बांधल्या, असे सरकार सांगते. पण कुठे बांधल्या, हे सांगत नाही,' असा बोचरा सवाल राज यांनी उपस्थित केला. 'फक्त कर्जमाफी देऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. स्वामिनाथन समितीच्या अन्य शिफारसीही अंमलात आणल्या पाहिजेत. सरकारने घोषणा करून ठेवल्या आहेत; पण पैसे नाहीत. योजनांना मात्र गोंडस नावे दिली आहेत. कुठल्याही क्षणी जवानांचे प्राण जातील, अशी सीमेवर परिस्थिती आहे. त्या जवानाला तिथे सीमेवर काय वाटत असेल? ज्या देशाने सैनिकांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे, तो देश क्रिकेट सामने पाहण्यात गुंग आहे,' अशी टीका राज यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com