मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत विविध कारणांमुळे लांबणीवर गेली असून, कोकण आणि मुंबई मंडळाने विविध ठिकाणी उभारलेल्या व्यावसायिक दुकानांची निविदा प्रक्रियाही लाल फितीच्या कारभारात अडकली आहे. त्यामुळे मुंबई मंडळाची 300 आणि कोकण मंडळाची 125 दुकाने धूळखात पडून आहेत.
म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये दुकाने राखीव ठेवण्यात येतात. त्यांच्या विक्रीसाठी निविदा मागवल्या जातात. दुकानासाठी अधिक किमतीची बोली लावणाऱ्यास दुकानांची विक्री करण्यात येते. मुंबई मंडळाकडे गोरेगाव, मालवणी, पवई, प्रतीक्षानगर आदी ठिकाणी सुमारे 300 दुकाने तयार आहेत. त्यांच्या विक्रीसाठी मुंबई मंडळाने निविदा प्रक्रियेची तयारीही केली होती, मात्र आजवर निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत. मुंबई मंडळाने 2010 मध्ये दुकानांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर आजपर्यंत दुकानांच्या विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मंडळाचे आर्थिक नुकसानही होत आहे.
मुंबई मंडळाप्रमाणे कोकण मंडळानेही दुकानांच्या विक्रीकडे दुर्लक्ष केले आहे. मंडळाच्या विरार-बोळिंजमधील गृहप्रकल्पात सुमारे 125 दुकाने आहेत, मात्र ती विक्रीअभावी पडून आहेत. त्यांच्या विक्रीबाबत सप्टेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.
|