मुंबई - गिरणी कामगारांसाठी "एमएमआरडीए' क्षेत्रातील घरांमध्ये 50 टक्के आरक्षण ठेवले जाणार असून, त्याची लॉटरी तत्काळ काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.
गिरण्यांच्या जमिनीवर बांधकाम वगळून मोकळ्या जागेच्या 33 टक्के जागेवर घरांसाठी जागा उपलब्ध होत असे. मात्र नियम 58 अंतर्गत बदल करण्यात येत असून त्यामुळे संपूर्ण जागा ग्राह्य धरण्यात येणार असल्याने गिरणी कामगारांना अधिक घरे उपलब्ध होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी गिरणी कामगार उपोषणाला बसले असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यांनीच "एमएमआरडीए' क्षेत्रातील घरांची लॉटरी तत्काळ काढण्याची मागणी केली, ती फडणवीस यांनी मान्य केली.
तसेच यावर अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, की मुंबई वगळता आपापल्या जिल्ह्यांमध्ये गिरणी कामगारांनी घरे स्वीकारली, तर मुंबईपेक्षा अधिक मोठी जागा त्यांना देणे शक्य होईल, असे सांगितले. मात्र मुंबईतच घर हवे, असा आग्रह असल्याने इतर जिल्ह्यांसाठी फार प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी सांगितले. या विषयीचा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.
|