मुंबई - गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर 29 सप्टेंबरला निर्णय देण्याचे आश्वासन राज्याचे प्रधान सचिव सुमित मलिक यांनी दिले आहे.
ते सरकारने न पाळल्यास मुख्यमंत्र्यांना यंदा "वर्षा' निवासस्थानी दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा गिरणी कामगारांनी मंगळवारी (ता. 1) आझाद मैदानात काढलेल्या मोर्चादरम्यान दिला. गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रधान सचिवांनी सोमवारी (ता. 31) कामगार नेत्यांशी चर्चा केली होती. राज्यातील सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगारांना घरे कुठे आणि केव्हा दिली जातील, याचा आराखडा दोन महिन्यांत तयार करण्याचे आदेश या वेळी संबंधितांना दिले होते. गिरणी कामगार संघर्ष समिती, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच आदी कामगार संघटनांचे कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांतील सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते.
'गिरणी कामगारांच्या घरांबाबतचा आराखडा तयार करण्याचा शब्द सरकारने पाळावा; अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माथाडी कामगार संघटना गिरणी कामगारांच्या पाठीशी उभे राहतील,'' असे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
|