मुंबई - मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या निकालास होत असलेल्या विलंबप्रकरणी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना हटवविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कुलगुरूंची निवड वशिल्यामुळे झाली होती, असा आरोप संघटनेचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केला आहे.
डॉ. देशमुख पूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कामाला होते. त्या वेळी विनय सहस्रबुद्धे प्रबोधिनीचे महासंचालक होते. या ओळखीचाच फायदा डॉ. देशमुख यांना हे पद मिळविण्यासाठी झाला. याच ओळखीमुळे त्यांना विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. नंतर ते विभागप्रमुखही झाले. कुलगुरूपदी नियुक्त होण्यापूर्वी डॉ. देशमुख यांनी विद्यापीठात अधिसभा, विद्वत परिषद, व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणांवर काम केलेले नाही. विद्यापीठ प्रशासन चालवण्यासाठी त्यांना आवश्यक अनुभव नाही, असे मातेले म्हणाले.
|