मुंबई - शाळांची गुणवत्ता वाढविण्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या तब्बल 20 शिक्षकांविरुद्ध पालिका प्रशासनाने पहिल्यांदाच निलंबनाची मोठी कारवाई केली निलंबन केलेल्यांमध्ये 12 शिक्षिका आणि 8 शिक्षकांचा समावेश आहे. यात चार मुख्याध्यापकांचाही समावेश आहे.
पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. इंग्रजी शाळांकडे पालिकांचा कल वाढत आहे. पालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याची टीका होत आहे. प्रशासनाने कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.
पालिका शाळांतील गुणवत्ता ढासळल्याची टीका सातत्याने केली जाते. गुणवत्ता वाढवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण खात्याचा प्रयत्न आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
तसे असताना अनधिकृत गैरहजर राहणे, शाळेची कमी शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुषंगाने पर्यवेक्षकीय कर्तव्यातील कुचराई, अनधिकृतरीत्या बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे, कर्तव्यात कसूर करणे या कारणांसाठी ही निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईतून मुख्याध्यापकही सुटलेले नाहीत. निलंबित केलेल्यांमध्ये चार मुख्याध्यापक असून, त्यातील एकाने शाळेतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी निलंबन केले आहे. निलंबित केलेल्या शिक्षकांमध्ये 2014 पासून अनधिकृतपणे सतत गैरहजर राहणाऱ्या एका शिक्षिकेचा समावेश आहे.
मुंबई पालिका शाळांची स्थिती
माध्यम : 8
प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या : 2 लाख 66 हजार 22
शिक्षकांची संख्या: 10 हजार 202
माध्यमिक विद्यार्थ्यांची संख्या ः 30 हजार 393
शिक्षकांची संख्या : 1 हजार 153
विशेष मुलांच्या शाळा : 17
विद्यार्थी संख्या : 846
शिक्षकांची संख्या : 91
|