मुंबई - महावितरणकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी मीटर रीडिंगशी संबंधित आहेत. या तक्रारींची संख्या कमी करण्यासाठी आता समांतर यंत्रणेद्वारे मीटर रीडिंगची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सध्या त्रयस्थ खासगी संस्थेद्वारे रीडिंग घेण्याचे काम राज्यभरात होते. मात्र, चुकीच्या पद्धतीमुळे मीटर रीडिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींत वाढ होत आहे.
मीटर रीडिंगच्या तक्रारी कमी करण्यासाठी महावितरण प्रत्येक झोनमध्ये एक पथक नेमणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे पथक समांतर मीटर रीडिंग घेण्याचे काम करेल. त्रयस्थ एजन्सीने एखाद्या घराचे मीटर रीडिंग घेतले की, काही वेळाने महावितरणच्या भरारी पथकासारख्या टीमकडूनही मीटर रीडिंग घेण्यात येईल. एजन्सी आणि महावितरणच्या पथकाने घेतलेल्या मीटर रीडिंगची तुलना करण्यात येईल. यामुळे याविषयीच्या तक्रारी कमी होतील, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रीडिंगनंतर एसएमएस
मीटर रीडिंगनंतर काही मिनिटांतच ग्राहकाला "एसएमएस' पाठवला जाईल. सध्या महावितरणच्या दोन कोटी 40 लाखांपैकी एक कोटी 10 लाख ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत. या ग्राहकांना महावितरण एसएमएस पाठवते.
|