मुंबई - शहर आणि उपनगरांत विकसकांनी अनेक प्रकल्प रखडवले आहेत. विकसकांच्या आर्थिक कारणांमुळे प्रकल्प रखडले असल्यास अशा प्रकल्पांचे एकत्रीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. विकसकाला प्रकल्प राबवणे शक्य नसल्यास असे प्रकल्प सरकार स्वत: ताब्यात घेऊन राबवेल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
म्हाडाच्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. वायकर म्हणाले, की दादर, माहीम, प्रभादेवी आदी परिसरात विकसकांनी प्रकल्प रखडवले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची फरपट होत आहे. हे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली.
|