प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी "इको रॉक्‍स' सरसावली 

प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी "इको रॉक्‍स' सरसावली 

मुंबई - सध्याच्या जीवनशैलीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटशिवाय पान हलत नाही; मात्र टाकावू लेक्‍ट्रॉनिक वस्तू इतस्ततः फेकल्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्याची दखल घेऊन मुंबई ई-कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा "इको रॉक्‍स' या स्वयंसेवी संस्थेने उचलला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मुंबई शहर आणि परिसरातील तब्बल पाच हजार किलो ई-कचरा गोळा करणारी ही संस्था आता "सकाळ'च्या "ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी' मोहिमेचा भाग होणार आहे. येत्या काळात "सकाळ'च्या प्लास्टिकमुक्त मोहिमेसाठी संस्था संयुक्तरीत्या उपक्रमही राबवणार आहे. 

"इको रॉक्‍स'च्या मोहिमेत तब्बल 50 सोसायट्यांबरोबरच 10 महाविद्यालये सहभागी झाली होती. मोबाईल, कॉम्प्युटर आणि ईअरफोनपासून इलेक्‍ट्रॉनिक खेळण्यांपर्यंत सर्व गोष्टी नादुरुस्त झाल्या की ई-कचरा म्हणून त्या फेकल्या जातात; मात्र दैनंदिन कचऱ्यामध्ये त्याचे विघटन होत नाही. उलट प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. ई-कचऱ्याने होणारी हानी टाळण्यासाठी "इको रॉक्‍स' संस्थेने पुढाकार घेतला असून मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. जनजागृतीबरोबरच त्यांना प्रत्यक्ष मोहिमेमध्येही सहभागी करून घेतले जात आहे. संस्थेने आतापर्यंत सायन, चेंबूर, घाटकोपर, सानपाडा, दहिसर, माटुंगा आदी परिसरातून तब्बल 50 हून अधिक सोसायट्यांना मोहिमेशी जोडून घेतले आहे. गुरुनानक, के. जे. सोमय्या, साठ्ये महाविद्यालय, टाटा समाज विज्ञान संस्था आदी दहाहून अधिक महाविद्यालयेही मोहिमेत सहभागी झाली आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल पाच हजार किलोहून अधिक ई-कचरा गोळा करण्यात आला आहे. "सकाळ'च्या प्लास्टिकमुक्तीच्या लढ्यात आता "इको रॉक्‍स' संस्था उतरणार आहे. ई-कचरामुक्तीबरोबरच शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी काही उपक्रमही राबविणार आहे. 

संस्थेच्या वतीने सोसायट्यांना ई-कचरा गोळा करण्याचे आवाहन केले जाते. संस्थेतर्फेच तो कचरा उचलला जातो. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ई-कचरा प्रोसेसिंग कंपनीमध्ये तो दिला जातो. तिथे त्या कचऱ्याचे पृथक्‍करण करून विघटन केले जाते. अधिकाधिक नागरिकांनी मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने रश्‍मी जोशी यांनी केले आहे. 

पर्यावरणस्नेही शैक्षणिक संस्थांना पुरस्कार 
"इको रॉक्‍स' संस्थेच्या वतीने नुकतीच पर्यावरणस्नेही शैक्षणिक संस्था पुरस्कार स्पर्धा घेण्यात आली. पाण्याचा वापर, ऊर्जेचा वापर, कचरा व्यवस्थापन, कागदाचा वापर, ई तंत्रज्ञान आदी प्रश्‍नावली विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. सायनमधील गुरुनानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने प्रथक क्रमांक पटकवला. के. जे. सोमय्या महाविद्यालयाने द्वितीय आणि रामानंद आर्य डी. ए. व्ही. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com