अजगरांचा मोर्चा वांद्रे, माहीम पट्ट्याकडे

python
python

मुंबई : सिमेंटचे जंगल म्हणून मुंबापुरीकडे पाहण्यात येत असले तरी या शहरातील अनेक भागांत आढळणारी जैवविविधता आशादायी आहे. त्यामुळे कधी काळी केवळ बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीकच्या पट्ट्यात दिसणारे अजगर आता थेट वांद्रे, माहीम पट्ट्यातही दिसू लागल्याने त्यांची ही जगण्याची धडपड सुखावह असल्याचे मत वन्यप्रेमी व्यक्त करत आहेत.

यंदा पावसाने मुंबईला दोन वेळा जोरदार झोडपले. परतीचा पाऊसही लांबला. त्यामुळे पूर्वी काही भागांत अपवादाने दिसणारे अजगर आता अधिक संख्येने दिसत आहेत. वस्तीत घुसलेल्या अजगरांची सुटका करण्यासाठी त्यामुळेच सर्पमित्रांना वारंवार दूरध्वनी येतात. स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स ऍण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेनेही त्याला दुजोरा दिला आहे.

मुंबईत अजगर केवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमा परिसरात आढळून येतात. दहिसर भागात वैशाली नगर, संपूर्ण गोरेगाव पट्टा, मालाड, मिरा रोड आदी परिसरात अजगर मुख्यत्वे आढळून येतात. शहरांत त्यांचे दिसणे फारच कमी असते. पूर्वी वर्षातून एकदा किंवा दोन वेळा अजगराची वस्तीतून सुटका करण्यासाठी दूरध्वनी येत होते. परंतु, आता शहरातील कांदळवनाच्या भागांत त्यांचे वारंवार दर्शन होत आहे. दर महिन्याला सुमारे 16 अजगरांची सुटका केली, अशी माहिती सर्प या प्राणीप्रेमी संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे यांनी दिली.

वांद्रे-कुर्ला संकुल, माहीम खाडी, माहीम पूल परिसरात मोठ्या संख्येने अजगर दिसत असल्याचे दूरध्वनी हेल्पलाईनवर येत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मात्र, ही बाब सुखावह असल्याचे मत सर्प संघटनेचे स्वयंसेवक व निसर्गमित्र चैतन्य कीर यांनी व्यक्त केली. एकीकडे आरेमधील अतिक्रमणांमुळे वन्य जीवांच्या अधिवासाला धोका पोहोचत असताना प्राणी-पक्ष्यांच्या अस्तित्वाचा लढा सुरू आहे. त्यातच अजगराने अधिवास बदलून अस्तित्वासाठी यशस्वी धडपड केली असेल, तर ती सुखावह गोष्टच म्हणावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कसे आले अजगर?
मुंबईतील पुरामुळे अजगर नाल्यांतून किनारी भागांत आले. शहरांत सहज अन्न मिळते. त्यामुळे अजगरांनी कांदळवनाच्या नजीकच्या पट्ट्यातच कायमचे वास्तव्य केल्याचे चैतन्य कीर यांनी सांगितले. शहरात उंदीर, कबुतरे, कुत्रे, मांजर व खारींची संख्या जास्त आहे. हे प्राणी-पक्षी अजगराचे आवडते भक्ष्य असल्याने नवी अन्नसाखळी वांद्रे व माहीम परिसरात तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले.

... तर अजगरांची संख्याही वाढणार
अन्न सहज उपलब्ध झाले, तर अजगरांचे प्रजननही वाढते. त्यामुळे या भागांत अजगरांची संख्याही वाढू शकते, असाही अंदाज आहे.

गणना महत्त्वाची
अजगरांची संख्या वाढत असेल, तर त्याकरिता त्यांची गणना आवश्‍यक आहे. मुंबईतील प्राणिमित्रांच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर अजगरांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेण्यात येत आहे. परंतु, शास्त्रीय पद्धतीने पुरेशा मनुष्यबळासह वन विभागाने अजगरांची गणना करावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com