मुंबई - मुंबईतील एल्फिन्स्टन रस्ता आणि परळ या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या दुर्घटनेतील मृतांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर या घटनेप्रकरणी चिंता व्यक्त करून भविष्यात त्या टाळण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानके, पादचारी पूल तसेच इतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेण्यासह उपाययोजना सुचविण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा तपशील लवकरच ठरविण्यात येईल.
दरम्यान, बैठक सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावरल पादचारी पूल तसेच परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली. सध्या राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे राज्यभरातील अंगणवाडीतील काम ठप्प झाले असून सेविकांना मानधन वाढून देण्याची मागणी केली. तसेच गेल्या आठवड्यात मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळातील कामावरून काढलेल्या रक्षकांना संरक्षण देण्याची मागणीही शिवसेना मंत्र्यांनी केली. या तिन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.
|