मुंबई - बांगलादेशात 10 लाख रोहिंगे निर्वासित लोक राहत असून त्यांना म्यानमारला परत पाठविण्यासाठी भारताने सहकार्य करावे, अशी मागणी बांगलादेश उचायुक्त सय्यद मुअझ्झम अली यांनी केली आहे.
बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका निभावल्याचे नमूद करून सय्यद मुअझ्झम अली यांनी आज महाराष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अली यांनी आज राज्यपाल के. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते.
बांगलादेश व भारत यांच्यातील संबंध आज सर्वोच्च पातळीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या धोरणाचा हा परिपाक असल्याचे त्यांनी नमूद केले. चित्तगाव बंदर भारतातील उत्तर पूर्व राज्यांसाठी खुले करणार असल्याचे नमूद करून भारताने बांगलादेशात जहाज बांधणी आणि औषधी निर्माण या क्षेत्रांत मोठी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारताची बांगलादेशातील गुंतवणूक सातत्याने वाढत असून रिलायन्स, अदाणी यांसह अनेक उद्योगांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रांमध्ये एकूण 9 ते 10 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
|