मुंबई - मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे या घटनास्थळी आल्या होत्या. त्यांनी पुरुष बराकीतील चार कैद्यांच्या मदतीने महिला बराकीतील पुरावे नष्ट केल्याचा आरोप अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांनी केला आहे. या आरोपांमुळे तुरुंग प्रशासनाच्या आणि साठे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या भायखळा कारागृहाच्या सहा महिला कर्मचाऱ्यांना आज न्यायालयात हजर केले. सहाही जणींना एक दिवसाची वाढीव पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. पोलिस कोठडीची मुदत संपली असून, तपासात प्रगती नसल्याने त्या सहाही जणींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे 24 जूनला सायंकाळी घटनास्थळी आल्या होत्या. घटनेच्या दिवशी कदम हे बराक क्र. 4 मध्ये होते. या वेळी हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले कैदी गुलाब यादव, चंद्रप्रकाश यादव, सुभाष यादव आणि मंडळ यांना सुभेदार अरुण जाधव, हवालदार बनसोडेंनी बराकीतून बाहेर काढले. हा प्रकार बराकीबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या चौघांनी महिला बराकीमधील काही वस्तू गोळा केल्या. यानंतर तुरुंगाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांच्या सांगण्यावरून त्या वस्तू (ता. 25 जून) कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आल्या. त्या वस्तू पुरावा म्हणून उपयुक्त होत्या. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी साठे आणि इंदुरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा याकरिता मुख्यमंत्र्यांना कदम यांनी पत्र लिहिल्याचे त्यांचे वकील ऍड. नितीन सातपुते यांनी न्यायालयाला सांगितले. पुरावे नष्ट करतानाच्या घटनेचे कदम साक्षीदार असल्याचे सातपुते म्हणाले.
|