मुंबई - कला, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मनमानी पद्धतीने गुण देण्याच्या शाळांच्या धोरणाला राज्य सरकारने लगाम घातला आहे. यापुढे विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 15 गुण देता येणार आहेत. त्यासाठी पात्रताही ठरविण्यात आली आहे. या संबंधीचा अध्यादेश आज शिक्षण विभागाने जारी केला. फक्त राज्याच्या बालनाट्य स्पर्धेत विभाग स्तरावर वैयक्तिक प्रथम क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्याला पाच अतिरीक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लोककलांसाठी जास्तीत जास्त 10 गुण देण्यात येणार आहेत.
कला, क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 15 ते 25 गुण देण्याचा अधिकार शाळांना दिला होता. मात्र, यात शाळा सर्वच्या सर्व गुण देत असल्याने यंदा दहावीत 100 टक्के मिळवणारे विद्यार्थी जाहीर झाले होते. यातून धडा घेऊन राज्य सरकारने जास्तीत जास्त 15 गुण देण्याचे धोरण निश्चित केले आहे. हे 15 गुण मिळवण्यासाठीही निकष तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी निकष ठरविण्यात आले असून, पुढच्या टप्प्यात क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी निकष ठरविण्यात येणार आहे.
बालनाट्य स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला अतिरीक्त पाच गुण देण्यात येणार आहे. या एकमेव विद्यार्थ्याला 20 गुण मिळणार आहे.
दोन टक्के जागा रद्द
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात दोन टक्के जागा रिक्त ठेवण्यात येत होत्या. मात्र, आता हा कोटा रद्द केला आहे. विद्यार्थ्यांना 15 गुण अतिरीक्त मिळणार असून, हा कोटा रद्द करण्यात आला असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
गुणांच्या प्रस्तावासाठी कालमर्यादा
या अतिरीक्त गुणांचे प्रस्ताव पाठविण्यासाठीही कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळांकडे 15 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचा आहे. तर शाळांनी 15 जानेवारीपर्यंत बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणे बंधनकारक आहे.
अतिरीक्त गुणांसाठी पात्रता
- इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षेत उत्तीर्ण हवा)
- ए ग्रेड - सात गुण
- बी ग्रेड - पाच गुण
- सी ग्रेड - तीन गुण
|