साडेसहा वर्षांनंतर विशेष न्यायालयाचा निर्णय
मुंबई - नौदल आणि तटरक्षक दलाने 2011 मध्ये केलेल्या कारवाईत अटक केलेल्या 15 सोमालियन समुद्री चाच्यांना मुंबई विशेष न्यायालयाने खून व अपहरणप्रकरणी दोषी ठरवत सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावला.
या चाच्यांनी थायलंडच्या "प्रंतालया' जहाजातील सुमारे 22 जणांना वेठीस धरले होते. 2011 मध्ये 120 समुद्री चाच्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या चार खटल्यांपैकी एकाचा निकाल बुधवारी लागला.
या 120 समुद्री चाच्यांनी विविध देशांतील सुमारे 91 जणांचे समुद्री प्रवासादरम्यान अपहरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात थायलंड आणि म्यानमारमधील 20 मच्छीमार होते. तटरक्षक दल आणि नौदलाने अरबी समुद्रात कोचीपासून 200 मैलांवर केलेल्या कारवाईत 22 परदेशी नागरिकांची या समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. या वेळी 15 सोमालियन चाच्यांनाही पकडण्यात आले होते.
या समुद्री चाच्यांनी साडेसहा वर्षे तुरुंगात घालवली आहेत. त्यामुळे शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील रणजित सांगळे यांनी दिली. न्यायालयाने अपहरण आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवल्यानंतर शिक्षेबाबत दया दाखवण्याची विनंती त्यांनी न्यायालयात केली होती.
इतर तीन प्रकरणांतील 103 सोमालियन चाच्यांबाबत विशेष न्यायालय पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे.
|