मुंबई - तीन-चार दिवस चढता राहिलेला पारा शुक्रवारी चार अंशाने खाली उतरला. शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी पारा 31.6 अंशावर असला, तरीही शनिवारपासून कमाल पाऱ्यात वाढ होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी कमाल पारा 32; तर रविवारी 33 अंश सेल्सिअसवर असेल. मात्र शुक्रवारी मुंबईसह कोकणात कमाल तापमान तुलनेने कमी वाढले असून इतर भागांत गेल्या आठवड्यापासून सरासरीहून तीन ते चार अंशाने वाढले. शुक्रवारी कोकणच्या इतर भागांत सरासरीहून केवळ एक ते दोन अंशाने पारा वाढला. अलिबागमध्ये कमाल 31; तर रत्नागिरीत 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा चढत असला, तरी किमान तापमान सरासरीहून खाली आहे. शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी तापमान ब्रह्मपुरी येथे नोंदवले गेले. ब्रह्मपुरी येथे किमान तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
|