मुंबई - मुंबई परिसरात चोवीस तासांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. मानखुर्द येथे व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा आईनेच खून केला, तर भांडुप येथे 18 वर्षांच्या तरुणाचा अनोळखी मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी खून केला. घरभाडे दिले नाही, म्हणून एकाचा खून झाल्याची घटना धारावी येथे घडली.
मानखुर्द साठेनगर परिसरातील अन्वारी इद्रीसी यांचा मुलगा नदीम मोहम्मद इद्रीसी (वय 24) अमली पदार्थाच्या आहारी गेला होता.
व्यसनासाठी तो घरातील नातेवाइकांना मारहाण करायचा. त्याच्याकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून 15 ऑगस्टला रात्री अन्वारी यांनी ओढणीने नदीमचा गळा आवळून खून केला. भांडुप येथील पाटकर कम्पाऊंड येथे बुधवारी (ता.16) रात्री आकाश दीपक वानखेडे (वय 18) याचा अनोळखी व्यक्तींनी खून केला. आकाशचे परिसरातील अल्पवयीन मुलासोबत भांडण झाले होते. या वादातूनच त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. धारावीतील हैदर कमरुद्दीन आलम (वय 38) याचा थकीत घर भाड्यावरून झालेल्या वादातून 28 वर्षांच्या तरुणाने छातीत कात्री खुपसून खून केला.
|