एकही अर्ज नाही; पारंपरिक शेतीकडेच कल
मुंबई - गुढीपाडव्याचे निमित्त साधत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी "उन्नत शेती समृद्ध शेतकरी' मोहीम जाहीर केली आहे. त्याला एकाही शेतकऱ्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
कृषिमंत्र्यांनी या मोहिमेची मोठा गाजावाजा करत घोषणा केली. शेतकऱ्यांना पिकांचा उत्पादनखर्च आणि घेतलेल्या पीककर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे, या उद्देशाने सरकार नियोजन करते. कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवत खरीप हंगामात लागणारे उत्तम दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे सरकारने जाहीर केले होते. पाच वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडाही तयार करण्यात आला. खतांचा मुबलक पुरवठा वेळेत करण्याच्या दृष्टीने व्यवस्थाही करण्यात आली. दर्जेदार कंपन्यांची कीटकनाशके, सरकारी प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते व जैविक कीटकनाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन केल्याचेही जाहीर करण्यात आले होते. सरकारकडे हे नियोजन तयार असले, तरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्याकडेच शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
खरीपपूर्व मशागत व पेरणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पिकांच्या मशागतीपासून कापणीपर्यंतची कामे पूर्ण करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. बैलांचे काम करू शकणारे लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र; तसेच धानासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, उसासाठी पाचटकुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर आदी खरेदीसाठी सुरवातीपासून अनुदान दिले जाईल, ही यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा राहील आणि त्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा केली होती; पण प्रत्यक्षात या यंत्रांची खरेदी आणि त्यासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्तावच आले नाहीत.
|