मुंबई - सुमारे 12 वर्षांपूर्वीच्या महाप्रलयात हाहाकार उडवल्यामुळे चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय झालेल्या मिठी नदीतून जलवाहतूक सुरू करण्याच्या हालचाली महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) सुरू केल्या आहेत.
एमएमबीचा मिठी जलवाहतूक प्रकल्प सुरू झाला, तर वांद्रे पूर्व, धारावी आणि विमानतळ परिसरातील रहिवाशांना प्रवासाचा नवा पर्याय मिळेल. मिठी नदीतील हा प्रवास पाच किलोमीटरपर्यंतचा असेल. या बहुचर्चित प्रकल्पासाठी एमएमबीने उद्योजकांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
मिठी नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ती प्रदूषित झाली आहे. जलवाहतूक सुरू झाल्यास ती स्वच्छ राहण्यास मदत होईल. वांद्रे-कुर्ला संकुलातल्या कलानगर-कपाडीयानगर आणि नयानगर या परिसरात जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. मिठी नदीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी उद्योजकांकडून 23 जूनपर्यंत प्रस्ताव येणे अपेक्षित आहे. नदीवर जेट्टी, प्रसाधनगृहे, प्रवासी थांबे आणि वाहनतळही उभारण्यात येतील, असे एमएमबीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
|